ग्रामपंचायत वर प्रशासक बसला आणि त्याचा फटका मात्र ठेकेदारांना बसला. इन्सुलि येथील ठेकेदारांनी आज स्वातंत्र्यदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले. कोणताही ठोस शासन निर्णय नसताना इन्सुलि ग्रामपंचायत ने प्रशासन बसल्यापासून ठेकेदारांची देयके न दिल्याने हे उपोषण छेडण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ही देयकांची रक्कम २ कोटी, २० लाख, ५६ हजार, ५८० रुपयांची असल्याची माहिती यावेळी संबंधित ठेकेदारांनी दिली.
याबाबत गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली असता, उपोषण कर्त्यांनी त्यांना आपल्याला अन्य जिल्ह्यातील पत्र दाखवून आमची दिशाभूल करू नका असे सांगितले. आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांचा ठेकेदारांना कोणत्याही प्रकारची देयके देता येत नाही याचे पत्र द्या. प्रशासक अन्य गोष्टीवर खर्च करू शकतो मात्र जनतेची सेवा केलेली कामे त्याची मात्र देयके अडवण्यात आली आहेत.असा आरोप यावेळी ठेकेदारांनी केला. यावेळी गटविकास अधिकारी यांनी आपण तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश देतो असं सांगितले.
मात्र ऐन चतुर्थी सण तोंडावर आलाय, करोडो रुपये अडकले अश्यावेळी आपण काय करायचे असा हतबल सवाल यावेळी उपोषण कर्ते ठेकेदारांनी केला. त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्याचा निकष आम्हाला न लावता पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी रामचंद्र विष्णू चराटकर, वृषाल विलास पोपकर, ऋषीकेश दत्ताराम पेडणेकर, सचिन शांताराम पालव, नंदकिशोर वासुदेव कोठावळे, आदि ठेकेदार उपोषणकर्ते उपस्थित होते..