श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मळगाव येथे भिल्लवाडी ग्रुप मळगाव व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे हा उत्सव उत्साहात होणार आहे.
दहीहंडी उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. पांडुरंग राऊळ पुरस्कृत प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच थरांच्या सलामीसाठी सात थरांना २,५०१ रुपये, सहा थरांना २,००१ रुपये, पाच थरांना १,५०१ रुपये आणि चार थरांना १,००१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यंदाच्या उत्सवाची ‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’ ही संकल्पना विशेष आकर्षण ठरणार आहे. गोविंदा पथकांच्या चित्तथरारक थरांच्या सलामीसह दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमामुळे मळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
या दहीहंडी उत्सवात परिसरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच नागरिकांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भिल्लवाडी ग्रुप मळगाव व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.