जिथे पिकते तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. हे लागू होतंय ते कोलगावातील पाण्या संदर्भात.
कुणकेरी धरणाचे पाणी हे काही वर्षांपूर्वी कोलगाव गावाला मिळत होते. या धरणासाठी कोलगाव, कुणकेरी गावातील लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. हेतू एवढाच होता की लोकांना पाणी मिळाले पाहिजे. मात्र काही कालावधीनंतर हे पाणी बंद करण्यात आले. या मागचे नेमके कारण लोकांना कळलं नाही.
मात्र पुन्हा एकदा कोलगाव गावातील पाण्याचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. कोलगाव गावातील लोकांना एप्रिल- मे महिन्या दरम्यान पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एवढ्या वर्षात जर राजकारणी लोकं जर हा प्रश्न सोडवू शकले नाहीत तर ती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कारण कोलगाव गावातील सर्वच राजकीय नेत्यांनी सत्ता भोगली आहे. त्या सत्तेच्या काळात त्यांना पाण्याचा प्रश्न कदाचित दिसला नसेल. मात्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी जोपर्यंत कोलगाव गावातील पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे तर विद्यमान सरपंच संतोष राऊळ यांनी नगरपालिकेने यात लक्ष घातले असून कोणीही यात राजकारण करू नये असे म्हणणे मांडले आहे. त्या विभागाशी संबंधित अधिकारी आणि नगरसेवक यांनी शाश्वत केले आहे असे म्हणणे मांडले.
मात्र यात सामान्य जनतेची नेमकी काय भूमिका असेल हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. जर हा प्रश्न सुटणार असेल तर तो सर्वांनाच कळला पाहिजे. यासाठी एक आमसभा ठेवून त्या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकांना माहिती दिली गेली पाहिजे. जर पाण्याची सोय नगरपालिकेच्या वतीने होणार असेल तर पाणी पट्टी किती बसेल, त्याचे नियम व अटी लोकांसमोर येणे गरजेचे आहेत. लोकांना अंधारात ठेवून कोणतेही निर्णय घेतले जाऊ नयेत अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे. मात्र जर वेळेत हे सर्व निर्णय घेतले गेले नाहीत तर मात्र निश्चित पाण्याची आणीबाणी ची परिस्थिती निर्माण होईल..
