वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत नागरिकांना दिलासा दिला. शहरासह परिसरात एकूण २१ ठिकाणी वादळाचा मोठा फटका बसला असून घरांची छप्परे उडणे, झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा विविध प्रकारच्या नुकसानीची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार केसरकर स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त कुटुंबांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे ठाम आश्वासन दिले. “नागरिकांनी धीर सोडू नये, शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून मदत प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनीही संबंधित भागांची पाहणी केली. त्यांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. तसेच आपत्ती ग्रस्थांना आवश्यक त्या सुविधा व मदत वेळेत पोहोचवली जाईल याची ग्वाही दिली.
