अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणूकीत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले. मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला. यानंतर अचानक नीलम शिर्के – सामंत यांनी एक पत्रक काढून निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यांनी निवडणुकीत उभ्या असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि मावळत्या संचालिका वर्षा उसगांवकर यांना पाठिंबा जाहीर केला. आता उद्या म्हणजेच मंगळवार २६ मे २०२६ रोजी या संदर्भातली कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
तब्बल १० वर्षांनंतर ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’ची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत १७ जागांसाठी ३४०३ मतदार मतदान करणार आहेत. सुरुवातीला विजय पाटकर विरुद्ध मेघराज राजेभोसले असे चित्र होते. पण आपला अर्ज कोल्हापूरला पोहोचूच नये यासाठी राजकारण झाल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला. एका मंत्र्याचे ओएसडी कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत आणि मतदारांवर दबाव आणत आहेत, असेही ते म्हणाले. यानंतर सुषमा अंधारे यांनी अचानक मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोप केला. आरोप करणाऱ्यांनी एकही पुरावा दिला नाही. पण आरोपांचा धुरळा उडू लागल्यावर पुढे काय होणार यावरून चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर नीलम शिर्के – सामंत यांनी एक पत्रक काढून निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.
मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेत ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या मावळत्या संचालिका वर्षा उसगांवकर यांना पाठिंबा जाहीर केला. नीलम शिर्के-सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील पडद्यामागचे नाट्य संपले आहे. आता पुढे काय घडते याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
