खरंतर महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो. याच महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यांनी अंधश्रद्धेला मूठमाती देत डोळस पणे पाहण्यास शिकवले. मात्र अजूनही काही लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात अडकलेले पाहायला मिळत आहेत.
कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचा विचार करायचा झाला तर ठरल्या प्रमाणे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी उभे ठाकले आहेत. हे दोन्ही आपापले मुद्दे अगदी पोटतिडकेने मांडताना पाहायला मिळत आहेत. मात्र बुवा, करणी, यासारखे मुद्दे हे पुढे येऊ नयेत असे वाटते. आज प्रत्येक राजकीय पुढारी हा कोणत्या ना कोणत्या बाबाचा भक्त असतोच. मात्र असल्या प्रकारामुळे गावातील वातावरण खराब होऊ नये एवढं नक्की.
विकासाचे मुद्दे, आपण लोकांना काय देणार, लोकांच्या गरजा कश्या पूर्ण करणार, येणाऱ्या ५ वर्षातील आपला रोडमॅप काय असेल हे जनतेच्या समोर येणं गरजेचे आहे. बुवा, बाबा यासारखे विषय निवडणुकीला भरकटवण्याचा प्रयत्न म्हणता येतील. गावातले वातावरण चांगले आहे आणि ते चांगले राहावे ही इच्छा गावातील लोकांची आहे. केवळ निवडणूक आली आणि वातावरण बिघडलं असं होता कामा नये. एखादा गुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे मात्र त्यासाठी कोणताही आताताईपणा करणे हे होता कामा नये. निवडणुकीत नेहमी प्रतिस्पर्धी हे आपले व्हिजन मांडत असतात आणि त्या पद्धतीने प्रचार करत असतात. ज्याचं व्हिजन लोकांना आवडत तोच विजयी होत असतो. त्यामुळे बाबा, बुवा, करणी यासारख्या मुद्द्याकडे लक्ष न देता जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर विचार होणे गरजेचे आहे..

