आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने तसेच तापमानातील बदलामुळे सदर मोहोर काळा पडला व फळधारणा होऊ शकली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून आता तोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत.तसेच अवकाळी पाऊस वारंवार होत असल्याने या अवकाळी पावसाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर आलेले आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सुद्धा जिल्ह्यातील बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.या अस्मानी संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व फळ बागायतदार मेटा कुटीला आलेला आहे.तसेच शेतकऱ्यांनी व आंबा काजू बागायतदारांनी खते, औषधे, कीटकनाशके,व्यवस्थापन व मशागत खर्चासाठी सहकारी सोसायटी,जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर राष्ट्रीयकृत, शासकीय बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. सर्व परिस्थितीचा विचार करता आंबा काजू शेतकरी व फळ बागायतदार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेले आहेत.तरी कृपया नुकसानग्रस्त शेतकरी व फळ बागायतदार यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करता शासनामार्फत जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्यात यावा विनंती निवेदनाच्या माध्यमातून माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ केली आहे.
