निरवडे नमसवाडी येथील वराह पालन प्रकल्प आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे.रोशन धारगळकर यांच्या मालकीचे हे वराह पालन ( डुक्कर पालन ) आहे. गेले अनेक महिने इथे सुरु असलेल्या या वराह पालणामुळे सभोवतालच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आजूबाजूच्या घरामध्ये त्या दुर्गंधीमुळे जेवण, झोपणे मुश्किल झाले आहे. संबंधित नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांना या संबंधि माहिती दिली होती. मात्र यावर योग्य तो तोडगा न काढता संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत. अश्यावेळी तिथल्या नागरिकांनी शिवसेना ( शिंदेगट ) जिल्हा प्रमुख संजू परब यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी आपण पालकमंत्री नितेश राणे यांना या विषयात लक्ष घालण्यासाठी सांगेन. त्याचप्रमाणे तुम्हाला योग्य तो न्याय मिळवून देईन असा विश्वास संजू परब यांनी संबंधित नागरिकांना दिला. यावेळी योगेश पारकर, प्रतीक्षा पारकर, वासुदेव गावडे, विनायक राणे, आनंद गोसावी, चंद्रशेखर पेडणेकर, आदि नागरिक उपस्थित होते.
